मी अहिंसा बोलते
सर्वत्र असलेले हिंसेचे वातावरण आणि वाढत चाललेली माणसाचे दुष्प्रवृत्ती हे पाहून भगवान महावीरांच्या अहिंसेचे मन आक्रंदित झाले . अहिंसेने तिची व्यथा आपल्या समोर मांडली आहे.
मी अहिंसा बोलते
अरे मानव, मी अहिंसा बोलते. शांती कुठे गेली रे?सतत तुला तणावग्रस्त बघतेस.तुझ्यापासून शांती ही लांब जात आहे. एवढ्यात मी सतत बघत आहे की, टीव्ही सुरू करा ,पेपर वाचायला घ्या सर्वत्र अशांतीच्या बातम्या. टीव्ही सुरू करताच बॉम्ब गोळ्याचे आवाज, सर्वत्र धूर, आगीचे लोळ. इथे हल्ला झाला तिथे हल्ला झाला. त्यामध्ये एवढे लोक मेले असे दृश्य सर्वत्र पहायला मिळते.अरे मानव, शांती कुठे हरविली रे? काय तो म्हणे पुतीन, मिसाइल वगैरे टाकून हजारों लोकांचे प्राण घेत आहे आणि आता तर न्युक्लिअर बाॅम्बचे बटण दाबायच्या गोष्टी.मानवी वृत्ती आहे की राक्षसीवृत्ती.दया,करुणा,क्षमा सर्व गेल्या कुठे?
अरे मानवा,मला पूर्णपणे विसरलास वाटतो तू. तुझ्या हृदयातील माझी जागा क्रोध,मोह, ईष्या, लालसा अशा हिंसक प्रवृत्तीने घेतली असे दिसते.कसा तू इतका दुर्विचारी झालास ? तुझ्या या हिंसक दुष्कर्माची फळे तुझी तुलाच चाखावी लागणार आहे बरं.माझ्या मनाची तळमळ आता मला स्वस्थ बसू देईना .म्हणून मी भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने तुला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहे.तुझ्यातील अहिंसात्मक प्रवृत्ती जागी होऊन सर्वत्र शांतीचा सुगंध दरवळू दे.तशी विवेकी बुद्धी तुला लाभो हीच वीरचरणी प्रार्थना.
युक्रेन मध्ये युद्ध सुरू आहे म्हणे . त्यात हजारो लोक मारले गेले ,हजारो लोक बेघर झाले असे समजले.पण पशुपक्षी, लहान जीवजंतू या कितींचा विध्वंस झाला असेल याची काही कल्पना केलीस तू?तू फक्त तुझाच विचार करतोस.
माझ्याकडे तू खूप सूक्ष्मपणे पाहायला पाहिजे.तुझी छोटी छोटी कृत्ये - जसे मुंग्या लागू नये म्हणून लक्ष्मणरेषा ओढतो, डासांपासून वाचण्यासाठी आॕल आऊट लावतो , पाण्याची किती उधळपट्टी करतोस ,शेतात किटकनाशकांचा अंदाधुंद प्रयोग करतो.तेव्हा मला किती वेदना होतात बरं.आचार्य शांतिसागर महाराजांच्या परंपरेतील तुम्ही.जिओ और जिने दो' ची संस्कृती तुमची.या संस्कृती ची पाळेमुळे माझ्यातच गुंतली आहे.पण आज कुठे गेल्या रे तुझ्या संवेदना? , मातापित्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखविलेली बघून मन दुखते ,वृक्षतोड करतांना तुझी कुऱ्हाड माझ्या जवळ येताच छातीत धस्स होते बघ.तुझ्यातील मातृत्व जेव्हा भ्रूणहत्या करायला तयार होते तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात. तुला कशा रे माझ्या वेदना कळणार? कारण तू खूप निष्ठूर होत चाललास. त्याला कारणही आहेत म्हणा .तू आज खूप मांसाहारी बनलास.जिभेचे चोचले पुरविण्यासाठी निष्पाप जीवांची हत्या करू लागलास,तुझे सौंदर्य खुलविण्यासाठी अनेक प्राण्यांचे रक्त आणि चमडीचा वापर करू लागला.गाईला देव मानणारा तू पैशाच्या मोहापायी तिला कसायाला विकू लागला.दया करणारा तू आज कसा एवढा कठोर झालास.रात्रीभोजन त्याग, पाणी गाळून पिणे ही जैनत्वाची लक्षणें तर विसरत चालला.
तू तूझी खूप प्रगती करीत आहे म्हणतोस हे बरोबर आहे .पण तू हे सर्व करताना मला बाजूला सारले .तेच तुला घातक ठरणार आहे.हवेत, पाण्यात सर्वत्र सूक्ष्म जीव आहे.आज मोठमोठे कारखाने सुरू करून त्यांतील विषारी वायू, द्रव्ये, पाण्यात, हवेत सोडले.ध्वनिप्रदूषणचा कधी विचार केलास का? मस्त डीजे लावून आनंदात नाचतोस.युध्दाच्या बातम्या ऐकतानाही मन द्रवीभूत होत नाही का? एक अणुबॉम्ब टाकल्याने त्यांचे होणारे दूरगामी परिणाम दिसत असूनही तू डोळेझाक करीत आहे.अरे, कुठे भोगशील या पापाची फळ? म्हणून वेळीच तुला जागे करायला आले मी.त्यासाठी तुला फक्त एवढेच करावे लागेल ते म्हणजे तुझ्या विवेकबुद्धीचा योग्य वापर.परमाणुबाॅम्ब बनविणाऱ्या ने म्हटलेच आहे की याचा वापर कशासाठी करायचा हे उपयोग करणाऱ्याच्या विवेकबुद्धी वर अवलंबून राहील.कारण म्हणतात नां की,सर्व भावनांचा खेळ. भावनाच भववर्धिनी आणि भावनाच भवनाशिनी.
तुझी प्रगती व्हावी , शांती मिळावी हीच माझीही इच्छा आहे.पण प्रत्येक क्रिया करताना यत्नाचारपूर्वक (विवेकपूर्वक) कर हिच माझी प्रार्थना.तुला पुढची शिदोरी चांगली न्यायची असेल तर नक्कीच माझा विचार करावा लागेल.तुझ्यातील माझ्या बद्दलचे प्रेम जेंव्हा जागृत होईल तेव्हा तूच एकदिवस देवतुल्य बनशील.मग करशील माझ्याशी दोस्ती.